Friday, December 19, 2008

सावर रे.....

एखादया व्यक्तिच्या आयुष्यातली अतिशय जवळची व्यक्ति,त्यातल्या त्यात आयुष्याचा जोडीदार अगदी अचानक अनपेक्षितपणे ह्या जगातुन कायमची निघून जाते....जाणारी व्यक्ति जाते, कुठे जात असेल कोणास काहीच माहीत नाही. ते बेजान शरीर एकदा संपल..संपवल कि त्या व्यक्तिचं अस्तित्व काय असत,कुठे असत कोणास ठाऊक ? असत कि नसत तेहि नाही सांगता येत. पण अशावेळी एक क्रुर,कटू सत्य मात्र अस्तित्वात असत आणि ते म्हणजे त्या व्यक्तिच्या जवळच ते जितजागतं जिवंत माणुस. ज्याच आयुष्य नुसतच बदलून जात नाही,तर पुर्णपणे ढवळून निघतं. उलटपालटं होऊन जातं. एक,दोन.....पाच,दहा.... वर्षामागून वर्ष निघून जातात.....ते स्वत:ला सावरतात,सावरण्याचा प्रयत्न करतात,किंवा निदान तस वरवर तरी दाखवतात. पण मधूनमधून काही प्रसंग घडतात,काही इतर लोक बोलतात....जखमेवरची खपली पुन्हा पुन्हा ओरबाडली जाते, आणि काहि काळापुरती का होईना ती जखम पुन्हा अगदी तशीच भळभळते....
मन सैरभैर होतं. पण काहीही ईलाज नसतो. नव्याने पुन्हा उभं रहावं लागत,स्वत:च स्वत:ला सावराव लागतं,समजवावं लागतं…..
इथे मग जाणारी व्यक्ती नैसर्गिकपणे गेली की अनैसर्गिकपणे, यावर बरच काही अवलंबून असतं. नैसर्गिकपणे गेली असेल तर मग मनात सारखे विचार येतात, प्रश्नच प्रश्न, माझ्याशीच अस का व्हावं ? मतभेद ,कुरबूरी तर सगळ्याच नात्यांमधे,कुटुंबांमधे असतात,पण या सगळ्यांसोबतही एकंदरीत आयुष्य तस चांगल चाललं होत ना,मग अस अचानक आपल्याच बाबतीत का घडावं ? आयुष्यभरची साथसोबत करण्याची आणि अशीच काही बरोबरीने पहिलेली असंख्य स्वप्न अशी का भंगावीत ? नशीबच वाईट आहे का माझं की आणखी काही…..? ईतरांच सगळं सुरळितपणे चालू असताना माझ्याच बाबतीत असं का? मीच का ? एवढा माझा काय गुन्हा की माझा सुखावर काही आधिकारच नाही का?फक्त प्रश्नच प्रश्न ??
उत्तर मात्र सगळी अस्पष्ट,धूसर,संन्दिग्ध….सगळ्यात मोठा प्रश्न,एवढी मोठी माझी काय चूक होती ?
आता हेच अनैसर्गिकपणे जर जोडीदार गेला, मग तर सारं आणखीच अवघड होऊन बसत. समाजाच्या त्या विचित्र नजरा, लोकांच्या चेहर्य़ांवरचे प्रश्न,कधीकधी टोमणे, अवहेलना....सगळच असह्य. अशावेळी वाटतं मला वेळीच जाणवल का नाही की काहीतरी बिनसतय, की जाणवूनही मी तिकडे दुर्लक्ष केल? यावर वेळीच काही तोडगा काढला असता तर एवढं गंभीर काही घडलच नसत कदाचित... माझी चूक होती की जोडीदाराची ? मग ती चूक एवढी मोठी होती का? कशालाच काही अर्थ उरत नाही……उरत फक्त एकटेपण, क्षणोक्षणी खायला उठणारं.... आजूबाजूला असतात सगळे,पण त्या गर्दितही ती व्यक्ती एकटी पडते,अगदी एकटी……याहीपुढे त्यांची मुलं असतील मग तर आणखीच कठीण परीक्षा. निष्पाप मुलांना सत्य परिस्थिती सांगण्यापासून ते त्यांच्या अगणित प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देण्यापर्यंत सगळ कसं असेल ते जे अशा प्रसंगांतून जातात त्यांनाच माहीत….
पण हो हो हो….ही झाली अशा प्रसंगांतून समोर आलेली काळी, निगेटिव बाजू. ह्या नाण्यालाही निश्चितच दूसरी जमेची बाजू असतेच की. खरंच काळ ह्या सगळयावर औषध ठरतो आणि मग हळूहळू का होईना ही बाजूही प्रकाशून निघते.किंबहूना आधिकच चमकायला लागते…. मला वाटत तुलनेनं कमी वयात अशा प्रसंगांतून गेलेली माणसं आयुष्यात काहीशी लवकर प्रगल्भ होतात. अशावेळी खरं तर जगाची,आजूबाजूच्या माणसांची खरिखूरी ओळख होते. कोण खरोखरच आपलं, मनापासून आपल्यासाठी आहे हेही कळत आणि कोण फक्त स्वार्थासाठी आजूबाजूला घोटाळत होते तेही कळत. कोणाला आपण किती आणि कशासाठी हवे होतो आहोत हेही प्रकर्षानं जाणवत. कधीकधी म्हणण्यापेक्षा जास्त सहवासात असल्याने नेहमीच थोडस टाळलेल्या किंवा गृहीत धरलेल्या व्यक्तींच,जोडीदाराच,आपल्या जीवनातल महत्व, गरज किंवा जरूरी अगदी मनापासून जाणवते. नकळत आपण जवळच्या सगळ्याच व्यक्तींना पहिल्यापेक्षा जरा जास्तच जपायला लागतो. त्यांच्या अगदी छोटयाश्या चूकांवरून वाद घालणारे आपण प्रसंगी तुलनेनं मोठया चूकाही पोटात घालायला शिकतो, आणि त्यांना कधी कधी समजही देतो तीही तटस्थतेनं,एका वेगळ्याच प्रगल्भतेनं. थोडक्यात काय तर अशा प्रसंगांनंतर आपण स्वत:लाही आणि इतरांनाही सहज माफ करायला शिकतो. जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच बदलून जातो. पुर्वी फक्त स्वत:पूरतच मर्यादित जग ठरवून ठेवणारे आपण,आपल सो काल्ड सुरक्षित कवच विस्तारतो ते ईतरांनाही शक्य तितक सामावून घेण्यासाठी...... माझा जोडीदार, माझी मूलं, माझं कुटुंब एवढयाचपुरता विचार करणारी अशी व्यक्ती दुसर्यांच्या मुलांनाही स्वत:च्या मुलांप्रमाणेच,किंबहुना कांकणभर आधिकच प्रेम,माया देण्याची शक्ति किंवा ईच्छाशक्ति मिळवते ती अशाच प्रसंगांतून. आणि मग आयुष्यात पुढे पुन्हा जोडीदार स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर मग ते नातं खरोखरीच प्रगल्भ आणि सार्थ,परिपुर्ण अस बनतं. निदान ते तसं बनवण्याचा मनापासून प्रयत्न तरी होतो हेही नसे थोडके….…..

सुवर्णा ( २९ / ०८ / २००८)

Monday, September 1, 2008


जगणं....मरणं....

रडवणं असतं अगदी सोपं ,
बघा जरा कुणाला हसऊन,
टाके घालायला वेळ लागतो,
सहज टाकता येतं उसऊन,

निर्धार पाळायला निश्चय हवा,
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते,
वेळ लागतो ती नीट खोडायला,

नाकारणं एक पळवाट असते,
सामोरं जाउनच होतो स्विकार,
कर्तव्यासाठी लागतोच त्याग,
हक्क करतात नुसती तक्रार,

एकदा पाडुन फोडलेले कप,
कधिच सांधता येत नाहीत,
एकदा दुरावलेली मने मग,
पहील्यासारखी होत नाहीत,

हार मानली की सारंच संपलं,
जिंकण्यासाठी लढायलाच हवं,
मरण तर काय क्षणाचा खेळ,
जगण्यासाठी झगडायलाच हवं........

Wednesday, June 11, 2008

वास .....

"पाऊल तूझे घराकडे,
लवकर कधीच वळले नाही,
कारण सहवासातील फूलणे,
तुला कधीच कळले नाही " ....सुवर्णा (जून २००३)



Saturday, May 24, 2008


नाते

सारे बिघडल्यासारखे !मोडून पडल्यासारखे !
ओठांवरी येई हसू - आतून ऱडल्यासारखे !

दाही दिशा म्हणतात या -`झाले जखडल्यासारखे !!`
सोडू नको गाणे़, जरी -जगणे भरडल्यासारखे !

बघणे तुझे माझ्याकडेचोरी पकडल्यासाऱखे !
का वाटले वळणावरी पाऊल अडल्यासारखे !

आयुष्य संपू लागले...वाया दवडल्यासारखे !
बरसायच्या आधीच का वाटे उघडल्यासारखे ?

देहावरी या बंधने...मनही मुरडल्यासारखे !
स्मित गूढ आहे का तुझे अर्थात दडल्यासारखे !

वागून वागावे कसे...?काही न घडल्यासाऱखे !
लिहिलेस माझे नाव तूतेही घुसडल्यासारखे !

होऊन मी बोलू किती ? माझेच नडल्यासारखे !
आठ्या कपाळी़... ओठही -होते दुमडल्यासारखे !

माझे-तुझे नाते जणू दुखणे रखडल्यासाऱखे !

कवी- प्रदीप कुलकर्णी

Wednesday, May 14, 2008

का ?

ओणवी झालीस तू हलकेच,
अन देह माझा चांदण्याने झाकला...
आंधळा अंधार मी...माझ्यावारी --
पौर्णिमेचा चंद्र का हा वाकला ?
व्यर्थ वणवणशील तू माझ्यासवे ,
भान याचेही तुला नाही जरा...
मी असा वारा...कुठेही हिंडतो...
शोधसी माझ्यात का तू आसरा ?
जन्म हा साराच काटेरी जरी,
स्पर्श तू केलास अन् झाली फुले...
आग आहे अंतरी; बाहेर ही --
पारिजाताची डहाळी का झुले ?
वेळ भेटीची चुकीची आपली...
वाट आहे वेगळी माझी-तुझी,
जाणिवांना आपल्या सारे दिसे...
प्रीत का ही आंधळी माझी-तुझी ?
मीच माझ्यातून निसटू पाहतो
आणि तू माझ्यात मिसळू पाहसी...
खूप झाले...अर्पिली काही पळे...
जन्म का साराच उधळू पाहसी ?
जाळती आतून- बाहेरून या,
काहिलीच्या, तल्खलीच्या वेदना....
फाटक्या माझ्या जिण्याला ही अशी,
लाभली का भर्जरी संवेदना ?

कवि : प्रदीप कुलकर्णी

Tuesday, May 13, 2008

माझ्या चारोल्या........

'ध्यानिमनी' नसताना,
तुझा विरह स्पष्ट आहे,
अशी कशी हि,
'एका लग्नाची गोष्ट' आहे ?....सुवर्णा

तु दिलेली कली,
अजून मी जपली आहे,
आपली तीं मैत्री आता,
जुन्या पुस्तकात लपली आहे !! ....सुवर्णा
कुणास कळते ह्रदयाची कळ?
अपुले आपण असतो केवळ..
असे कसे हे अपुले नाते..
मला घाव अन् तुला कसे वळ?
कुठून आणू उसने मागुन,
पुन्हा पुन्हा मी जगण्याचे बळ?
कितीक द्यावी स्पष्टीकरणे..
कितीक आपण काढावा पळ ?
तुला भेटुनी खरेच पटले....
उगीच नव्हती माझी तळमळ....
तुला बिलगुनी आला वारा....
इथे अचानक सुटला दरवळ !!